"चिमुकली पाउले जेव्हा लहाणाची मोठी होतात,
आईची ममता आणि वडिलांची छाया यांची जागा मित्र घेतात,
पण त्यानी दिलेले संस्कार मनात तसेच कायम राहतात,
वेळ बदलते, माणसं बदलतात पण ते संस्कार बदलत नसतात...
मित्रांच्या सहवासात आपण 'मित्र' म्हणून घडतो,
शिक्षकांच्या शिस्तीत आपण 'माणूस' म्हणून घडतो,
निखळ आणि निष्पाप मैत्रीचे ते धागे कायमचेच गुंफले जातात,
वेळ बदलते, माणस बदलतात पण ती नाती बदलत नसतात...
बालपणीची ती नाजुक पाउले परखड तारुण्यात पडतात,
मित्र बदलतात, स्वप्न बदलतात, जगण्याच्या दिशासुद्धा बदलतात,
पण बालपणीचे ते मंतरलेले दिवस मनात नेहमीच 'अविस्मरनीय' असतात,
वेळ बदलते, माणसं बदलतात पण ते क्षण बदलत नसतात...
सोळाव्या वर्षातले ती तरुण पाउलं नकळतच प्रेमात पडतात,
विखुरलेल्या भावना मग एका/एकी भोवतीच फिरू लागतात,
प्रेमाच्या त्या अलगद प्रवासाच्या कहाण्या आठवणी बनून बसतात,
वेळ बदलते, माणसं बदलतात पण त्या भावना बदलत नसतात...
अचानक ती व्यक्ती दूर जाते, आयुष्याची गणितच बदलतात,
अफाट लोकांच्या गर्दीतही एकटे करून सोडतात,
पण तो/ ती च्या सोबतचे ते सुखद क्षण मनाच्या नेहमीच जवळ असतात,
वेळ बदलते, माणसं बदलतात पण आठवणी बदलत नसतात...
दुखांच्या त्या तापत्या उन्हात मग सावली काही मित्र देतात,
पडलेल्या चेहऱ्यावर, उदास ओठांवर हसू खुलवून जगण्याला पुन्हा बळ देतात,
स्वतःची दुःख विसरून आपल्या सुखासाठी झटणारी अशीही माणसं भेटतात,
वेळ बदलते, माणस बदलतात पण आठवणी बदलत नसतात...
आयुष्याच्या प्रवासात माणसं येतात आणि जातात,
काही सोडून जातात, काही जन्मभर साथ देतात,
प्रत्येकाची तऱ्हा वेगळी, प्रत्येकाच्या आठवणी वेगळ्या,
कधी हसवतात, कधी रडवत असतात,
तुमच्या - माझ्या - प्रत्येकाच्या आयुष्यात अशा घटना घडत असतात,
दुख विसरुन सगळेच हसत हसत जगत असतात,
वेळ बदलते, माणसं बदलतात पण या आठवणी मात्र बदलत नसतात..."
'शब्द माझे बोलके'
(मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा काव्यात्मक प्रयत्न...)
शब्दांकन - गौरव श्रावगे